वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन
आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नांना यश!

चिखली : महाराष्ट्र शासनाने “वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, या निर्णयामुळे समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी नवे दालन खुले झाले आहे.या ऐतिहासिक निर्णयाबाबत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की,“सकल राजपूत समाजाचे राष्ट्राच्या जडणघडनी मध्ये योगदान अतुलनीय आहे. शौर्य, पराक्रम, देशभक्ती आणि स्वाभिमानाची परंपरा जपणाऱ्या या समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची गरज आम्ही वारंवार अधोरेखित केली होती. विधानसभेच्या अधिवेशनात मी स्वतः ही मागणी केली होती व शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर महाराष्ट्र शासनाने या मागणीस मान्यता देत ‘वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करून राजपूत समाजाच्या प्रगतीसाठी मोठा निर्णय घेतला आहे.”आमदार महाले पाटील यांनी पुढे सांगितले की,“या महामंडळाच्या स्थापनेमुळे शिक्षण, रोजगार, उद्योग, उद्योजकता, तसेच स्वावलंबनाच्या क्षेत्रात राजपूत समाजातील युवकांना नव्या संधी उपलब्ध होतील. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हे महामंडळ एक भक्कम व्यासपीठ ठरेल.”आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे याबतीत विशेष आभार मानले. “या महामंडळाच्या स्थापनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच समाजाच्या विकासासाठी हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला,” असे त्यांनी नमूद केले.या निर्णयामुळे वीर शिरोमणी महाराणा प्रतापांच्या आदर्शांचा वारसा पुढे नेण्यास, तसेच समाजाचे सामाजिक ऐक्य व राष्ट्रनिर्मितीतील योगदान अधिक बळकट करण्यास नक्कीच हातभार लागेल, असा विश्वास आमदार श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केला…



