ब्रेकिंग न्यूज

समृद्धी महामार्गावर बर्निंग बसचा थरार प्रवासांना वाचविले, पण चालकाचा होरपळून मृत्यू

वैजापूर…..समृद्धी महामार्गावर पहाटे भीषण अपघात घडला, ज्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. चॅनल नंबर ४६३ परिसरात मुंबईकडून येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागली. काही क्षणांतच आग इतकी भयंकर पसरली की बस पूर्णपणे जळून खाक झाली. या बसमध्ये एकूण २९ प्रवासी प्रवास करत होते. आग लागली तेव्हा बसचालकाने तत्काळ रस्त्याच्या कडेला बस थांबवली. पण आगीचा वेग इतका जास्त होता की चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तथापि, बसमधील उर्वरित २८ प्रवाशांनी तत्परतेने बसमधून बाहेर उड्या मारल्या आणि आपले प्राण वाचवले. जखमी प्रवाशांना त्वरित रुग्णवाहिकांद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस, महामार्ग पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही, पण शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळित झाली होती..

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!